नवी दिल्ली – एनसीईआरटी ने नववीच्या पुस्तकातून संविधानाची उद्देशिका हटविली त्याउलट आणीबाणीचा पाठ समाविष्ट केल्याने वाद निर्माण झाला आहे .
गुरुवारी प्रकाशित झालेल्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या (NCERT) इयत्ता ९ वीच्या सामाजिक शास्त्राच्या नवीन पाठ्यपुस्तकात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या ‘आणीबाणी’चा (Emergency) समावेश करण्यात आला आहे; मात्र, मागील पाठ्यपुस्तकात ठळकपणे समाविष्ट असलेली ‘संविधानाची उद्देशिका’ (Preamble) तसेच ‘धर्मनिरपेक्ष’ (secular) आणि ‘धर्मनिरपेक्षता’ (secularism) यांसारख्या शब्दांचे संदर्भ यात वगळण्यात आले आहेत, ज्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२०’ आणि ‘शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF-SE) २०२३’ अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेल्या या सुधारित पाठ्यपुस्तकात संविधानाची निर्मिती, लोकशाही संस्था आणि मूलभूत अधिकार यांवर चर्चा केली आहे, परंतु त्यात संविधानाची उद्देशिका जशीच्या तशी दिलेली नाही किंवा त्यातील संज्ञांचे स्पष्टीकरणही केलेले नाही. तसेच, इयत्ता ९ वीच्या सुधारित अभ्यासक्रमात पहिल्यांदाच ‘आणीबाणी’चा समावेश करण्यात आला असून, त्या काळात लोकशाही संस्थांवर प्रचंड ताण आला होता आणि नागरिकांची स्वातंत्र्य संकुचित करण्यात आली होती, असे वर्णन यात केले आहे.
या बदलांमुळे भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे की, भावी पिढ्यांना ‘आणीबाणीच्या काळातील काळी कृत्ये’ समजली पाहिजेत; तर दुसरीकडे काँग्रेसने आरोप केला आहे की, हे पाऊल ‘विभाजनकारी राजकारण’ आणि घटनात्मक मूल्यांवरील हल्ल्याचा भाग आहे.

