नवी दिल्ली – विविध परीक्षांमधील घोटाळ्यांप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी दिल्लीत शिक्षण मंत्रालयासमोर निदर्शने केली .
‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’ने (AISA) दिल्लीतील शिक्षण मंत्रालयाबाहेर, NEET, SSC, CBSE आणि CUET यांसारख्या परीक्षांमधील कथित अनियमितता आणि घोटाळ्यांविरोधात निषेध मोर्चा आयोजित केला; तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
‘AISA’च्या माहितीनुसार, आंदोलकांनी वारंवार होणारी प्रश्नपत्रिका गळती, गुणांच्या गणनेतील चुका आणि परीक्षा पद्धतीतील कथित अपयशाबाबत चिंता व्यक्त केली. संघटनेने असा दावा केला की, जेव्हा हा मोर्चा मंत्रालयाच्या जवळ पोहोचला, तेव्हा पोलिसांनी आंदोलकांना अडवले; तसेच अनेक कार्यकर्त्यांवर कथितरित्या बळाचा वापर करत त्यांना ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना कापसहेरा पोलीस ठाण्यात नेले.
‘AISA’च्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा आणि दिल्ली विद्यापीठ सचिव अंजली यांच्यासह इतर विद्यार्थी नेत्यांनी, सरकारने विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि आंदोलने दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. JNUSU चे माजी अध्यक्ष नितीश कुमार आणि इतर विद्यार्थी नेत्यांनीही याप्रकरणी उत्तरदायित्वाची मागणी केली, तसेच ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’वर (NTA) कारवाई करण्यासह परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याची मागणी केली.

