नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तानमधील १०० हून अधिक प्रतिष्ठित नागरिकांनी मोदी आणि शाहबाज यांना पत्र लिहून ‘सततच्या शत्रुत्वाला’ पूर्णविराम देण्याचे आवाहन केले आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला, आरजेडीचे खासदार मनोज झा आणि एजेयूपी (AJUP) नेते हुमायून कबीर यांच्यासह स्वाक्षरी करणाऱ्यांनी नवी दिल्ली आणि इस्लामाबाद येथे उच्चायुक्तांची पुन्हा नियुक्ती, सामान्य व्हिसा सेवांची पुनर्स्थापना आणि हवाई क्षेत्र पुन्हा खुले करण्याची मागणी केली.
शांतता, सामान्य स्थिती, संवाद आणि सहकार्य पुनर्स्थापित करण्याच्या दिशेने अर्थपूर्ण आणि सातत्यपूर्ण पावले उचलण्याचे आवाहन दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना करताना, भारत आणि पाकिस्तानमधील १०० हून अधिक प्रतिष्ठित नागरिकांच्या गटाने मंगळवारी सततच्या शत्रुत्वाला संपवण्याची मागणी केली. त्यांच्या मते, या शत्रुत्वामुळे दोन्ही बाजूंच्या लाखो तरुणांना संधी, समृद्धी आणि सुरक्षित भविष्यापासून वंचित राहावे लागत आहे.
त्यांनी पूर्ण राजनैतिक संबंधांची पुनर्स्थापना आणि नवी दिल्ली व इस्लामाबाद येथे उच्चायुक्तांची पुन्हा नियुक्ती करण्यासोबतच दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी सामान्य व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.
‘सेंटर फॉर पीस अँड प्रोग्रेस’द्वारे जारी करण्यात आलेल्या आणि भारत व पाकिस्तानमधील महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींसह ११७ जणांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या या खुल्या पत्रात अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये तात्काळ राजनैतिक उपाययोजनांपासून ते पद्धतशीर संवाद पुन्हा सुरू करणे, लोका-लोकांमधील संपर्क पुन्हा जोडणे आणि धार्मिक व सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.
भारताकडून या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या ६१ जणांच्या यादीत नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख डॉ. फारुख अब्दुल्ला, फुटीरतावादी नेते मीरवाइज उमर फारुख, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती, आरजेडीचे खासदार मनोज झा, तसेच टीएमसीचे माजी मंत्री आणि सध्याचे एजेयूपी नेते हुमायून कबीर यांचा समावेश होता.
पाकिस्तानच्या बाजूने स्वाक्षरी करणाऱ्या ५६ जणांमध्ये माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसूरी, मुत्सद्दी अश्रफ जहांगीर काझी, नॅशनल असेंब्लीचे सदस्य इस्फान्यार भंडारा, तसेच अणुभौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक परवेझ हुडभॉय यांसारख्या राजकीय व प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश होता

